Thursday, 11 January 2018

विठ्ठलाचा लढा पांडुरंगाशी...

जेव्हा आपण खूप मनापासून एखादी गोष्ट करतो, त्यातून त्यात उत्कट सेवाभाव असतो तेव्हा आपल्याला ईश्वरी स्पर्श झालेला असतो... !
डीमिन्शीया, पार्किंसंस आणि अल्झायमर अशा असाध्य आजारांनी जेव्हा आईला वेढलं तेव्हा हातातलं सारं यश बाजूला ठेवून 'तो' तिच्या सेवेत रमला.. खूप मनापासून.. उत्कटतेने.. सेवाभावाने!!
डॉक्टर आणि सगळं जग म्हणत होतं या आजारातून कुणीच बाहेर पडू शकत नाही. हार का मानायची? त्याने लढा उभारला थेट देवाशी!
विठ्ठल उभा राहिला पांडुरंगासमोर! आईसाठी !!
हा विठ्ठल म्हणजे प्रख्यात उद्योजक, लेखक विठ्ठल कामत! त्यांच्या आईचं वय ९० वर्षांचं! या तीन आजारांनी वेढलेलं.. जगण्यातील विरक्ती आणि असहायतेतून हे आजार होतात. जगात या आजारावर औषध नाही. बिल गेट्स सारखा माणूस म्हणूनच यासाठी ८०० कोटी रुपये देऊ करतोय.
विठ्ठल कामत म्हणजे अखंड व्यापात गढलेला माणूस. व्यवसायाचा जगभरात विस्तार. कोट्यवधीची उलाढाल. नव्या योजना. विस्ताराचे प्लांनिंग...
सगळं सगळं आईसाठी बाजूला ठेवलं...!!
त्यादिवसापासून विठ्ठलाची आई झाली.
ते इंदिरा कामत बनले आणि आई तिचा लहानगा विठ्ठल!!
प्रेमाने, मायेने, वात्सल्याने, जिव्हाळ्याने सारं काही बदलू शकतं..
असाध्य वाटणाऱ्या या आजारातून आईला त्यांनी बाहेर काढलं.
आज नव्वदीतही आई उत्साहाने जगतेय..
अजून जगायचं म्हणतेय.. कंपवाताने पूर्वी न उचलणारा हात उंचावून दाखवतेय आणि चक्क गाणीसुद्धा म्हणतेय...
शेवटी इतकच म्हणावंसं वाटतं
ए बुरे वक्त जरा अदब से पेश आ...
वक्त को वक्त नही लगता वक्त बदलने मे... !!

(आईला एकटीला सोडून एक मुलगा परदेशात राहत होता. तीन महिन्यांनी घरी परतला तेव्हा घरात आईचा फक्त सापळा उरला होता..
अशाच एका आजारी आईला साखळीने बांधून ठेवणारा 'कुपुत्र'सुद्धा याच देशातला होता.. अशा कितीतरी घटना आहेत.
आईवडिलांना विमानतळावर नेऊन सोडून देणारे, केदारनाथ, वैष्णोदेवीला नेतो असं सांगून वाटेत सोडून देणारे 'मातृभक्त' सुद्धा याच जगात आहेत. असे हात सोडलेले तब्बल ४६ हजार आईवडील आज एकाकी फिरताहेत.
अशा वेळी असा एखादा विठ्ठलच आपल्या डोळ्यांत अंजन घालू शकेल नाही का?)